पुणे, दि. — शांतिनगर–येरवडा पुलाजवळील मुळा नदी परिसरात धार्मिक कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्यामुळे नदी प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालल्याचे समोर आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता व पुणे पँथर सेना अध्यक्ष सचिन भोसले यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
सदर भागात अनेक नागरिक नदीकाठी येऊन हार, फुले, अगरबत्ती, देवांचे फोटो, अन्नधान्य, चपाती, भाज्या तसेच इतर धार्मिक वस्तू थेट नदीत टाकत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. जलचर जीवांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे, तसेच परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीकाठची झाडे आणि पर्यावरणीय समतोलही धोक्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे पँथर संघटनेचे अध्यक्ष सचिन भोसले यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, “नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. मात्र नागरिकांमध्ये अद्याप अपेक्षित जनजागृती झालेली नाही. ती तातडीने वाढवणे गरजेचे आहे.”
ते पुढे म्हणाले, “जनजागृतीसोबतच योग्य पर्याय उपलब्ध करून देणेही अत्यंत आवश्यक आहे. नदीकाठी डस्टबिन आणि नर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले, तर नागरिक धार्मिक कचरा योग्य ठिकाणी टाकतील आणि नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात टाळता येईल.”
सचिन भोसले यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, “आपली नदी म्हणजे आपला जीव आहे. पुढील पिढीसाठी स्वच्छ पर्यावरण देणे ही आपली जबाबदारी आहे. धर्म जपत असताना पर्यावरणाचे रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दिल्लीसारख्या शहरांमध्ये प्रदूषणाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे; अशी वेळ पुण्यावर येऊ नये यासाठी आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे.”
यासोबतच त्यांनी प्रशासनाकडे काही ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यामध्ये नदीकाठी डस्टबिन व नर्माल्य संकलन केंद्र उभारणे, संकलित कचऱ्याचे कंपोस्टिंग किंवा योग्य विल्हेवाट लावणे, नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे, पोस्टर-बॅनर व सोशल मीडियाद्वारे प्रचार करणे, कृत्रिम विसर्जन टाक्या उपलब्ध करून देणे, पर्यावरणपूरक धार्मिक साहित्याचा वापर वाढवणे तसेच संवेदनशील ठिकाणी देखरेख वाढवून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणे यांचा समावेश आहे.
नदी व पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे तर सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत सचिन भोसले यांनी सर्वांनी एकत्र येऊन पुण्यातील नद्या स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























