उरळी कांचन–शिंदवणे गौणखनिज प्रकरण गंभीर
खोटा पंचनामा, अधिकारी संगनमताचा आरोप; पत्रकारांवर मारहाण, जीवितास धोका
पुणे | प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील उरळी कांचन–शिंदवणे परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणी वारंवार तक्रारी होऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने परिस्थिती चिघळली असून, थेट पत्रकारांवर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
या प्रकरणात मंडळ अधिकारी माधुरी बगळे आणि शिंदवणे येथील तलाठी ढगे यांच्या भूमिकेबाबत गंभीर आरोप करण्यात येत आहेत. तक्रारदार पत्रकार तथा माहिती अधिकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात गैर अर्जदारांच्या संगनमताने खोटा पंचनामा केल्याचा संशय आहे. तसेच कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने सह्या घेण्याचा प्रयत्न झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
कॉल करून बोलावले; नंतर संरक्षण नाकारले
आज दिनांकास 5/1/2026 दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास मंडळ अधिकारी माधुरी बगळे यांच्या सांगण्यावरून घटनास्थळी येण्याबाबत फोनद्वारे संपर्क करण्यात आला. “या, गरज आहे” असे सांगण्यात आले. या संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे.
मात्र घटनास्थळी पोहोचल्यानंतर “तुम्ही आलात तरी काही होणार नाही” असे सांगण्यात आले आणि काही वेळातच दमदाटीची परिस्थिती निर्माण होऊन पत्रकार अमीर शेख व सहकारी पत्रकार सोमनाथ खंडागळे यांना मारहाण करण्यात आली.
मारहाणीची माहिती देऊनही पोलीस संरक्षण नाही
विशेष म्हणजे, मारहाण सुरू असतानाच ही बाब मंडळ अधिकारी माधुरी बगळे यांना तात्काळ कळविण्यात आली, मात्र त्यांच्या स्तरावरून पोलीस स्टेशनला कळवून संरक्षण देण्यात आले नाही, असा गंभीर आरोप आहे. उलट संबंधित गैर अर्जदारांना अप्रत्यक्ष मदत मिळाल्याची परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे पत्रकारांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आधीही ई-मेल तक्रार; तरीही दुर्लक्ष
या बेकायदेशीर उत्खनन प्रकरणाबाबत यापूर्वीही ई-मेलद्वारे तक्रार दिलेली असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या दुर्लक्षामुळेच पुढे जाऊन हिंसक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
चौकशी व कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणात —
बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन
खोटा पंचनामा
प्रशासनिक दुर्लक्ष
पत्रकारांवर शारीरिक हल्ला व सुरक्षा नाकारणे
या सर्व बाबी अत्यंत गंभीर व फौजदारी स्वरूपाच्या असल्याचे सांगत, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास लोकायुक्त, मानवाधिकार आयोग व न्यायालयीन मार्गाने लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























