थेऊर येथे यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन : शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व पुरस्कार वितरण
पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीक्षेत्र थेऊर, ता. हवेली, पुणे येथे यशवंत कृषी महोत्सव दिनांक 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.
आज या महोत्सवाच्या उद्घाटनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांना महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आले. या निमित्ताने झालेल्या बैठकीत हवेली तालुक्याचे माजी आमदार श्री. रमेश आप्पा थोरात, माजी आमदार श्री. अशोक बापू पवार, ज्येष्ठ नेते श्री. सुरेश आंण्णा घुले, उद्योजक श्री. संदीप शेठ धुमाळ, पुणे जिल्ह्यातील युवा नेते श्री. सचिनतात्या तुपे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी माहिती देताना सांगितले की, या कृषी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून महोत्सवात शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या कृषी महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पीक पद्धतींचे प्रदर्शन तर असणारच, पण पशुपक्षी प्रदर्शनाचाही विशेष समावेश करण्यात येणार आहे.
या महोत्सवात सुमारे २०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून शेतकऱ्यांना खालील विषयांवर माहिती व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे –
आंतरराष्ट्रीय शेती अवजारे व अत्याधुनिक तंत्रज्ञान
बियाणे व कीटकनाशके
हरितगृहे व कृषी जैविक तंत्रज्ञान
हॉर्टिकल्चर, फळबाग, मसाला व भाजीपाला शेती
मासेमारी व अक्वाकल्चर
डेअरी तंत्रज्ञान व दुग्धविकास
शेतमाल प्रक्रिया उद्योग व वेअरहाऊस
अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प
कृषी विपणन तंत्रज्ञान व कृषी बाजारपेठ
अर्थसाह्य संस्था, कृषी कर्ज व वित्तपुरवठा
सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती पद्धती
शेळी-मेंढी पालन व पशुपालन
समूह शेती व शेतकरी बचत गट
या महोत्सवाचा आणखी एक विशेष उपक्रम म्हणजे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, महिला व कृषिकन्या यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण होणार असून नव्या पिढीला कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यास मदत होईल.
या महोत्सवाच्या आयोजनात कल्याणकर इव्हेंट मॅनेजमेंट चे श्री. प्रशांत कल्याणकर, सौ. सीमा प्रशांत कल्याणकर, श्री. ऋतुराज जवंजाळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानचे समन्वयक श्री. बापू सोनवणे यांनी सर्व कार्यसंघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
यशवंत कृषी महोत्सवामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी उद्योग, पशुपालन व पर्यायी शेती उपक्रमांविषयी थेट मार्गदर्शन मिळणार असून यामुळे शेती व्यवसाय नफा मिळवणारा व रोजगारनिर्मिती करणारा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























