“पाषाण तलाव मृत्यूच्या छायेत; हजारो मासे मृत – जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, अन्यथा न्यायालयीन लढा”
पुणे प्रतिनिधी – पुण्यातील ऐतिहासिक व पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा पाषाण तलाव सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला असून, नुकत्याच घडलेल्या घटनेत हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पर्यावरण प्रेमी, तक्रारदार अनंत घरत यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत पोलिस आयुक्तांकडे गुन्हा दाखल करण्याचे निवेदन सादर केले आहे.
तसेच, पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे सदर प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याबाबत स्वतंत्र पत्रही देण्यात आले आहे.
१८६७-६८ मध्ये ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला पाषाण तलाव हा पुण्याचा पर्यावरणीय वारसा मानला जातो. स्थलांतरित परदेशी पक्ष्यांचे अधिवासस्थान म्हणून ओळख असलेल्या या तलावाची सध्याची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे.
तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठणे, तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी (untreated sewage) थेट मिसळणे, यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, हजारो मासे मृत झाल्याची घटना समोर आली आहे.
तक्रारदार अनंत घरत यांचे म्हणणे
“पाषाण तलाव हा केवळ जलस्रोत नसून एक वारसा स्थळ आहे. येथे अनेक स्थलांतरित परदेशी पक्षी वास्तव्यास येतात. मात्र, पुणे मनपा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सातत्याने दुर्लक्ष केले आहे. तलावात येणारे नैसर्गिक प्रवाह हे प्रदूषित व सांडपाण्याने युक्त असल्यामुळे तलावाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकारी कर्तव्यात कसूर करत असून, त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, आम्हाला न्यायालयीन लढा उभारण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा इशारा तक्रारदार अनंत घरत यांनी दिला.
सदर प्रकरणी पुणे महानगरपालिका – मलनिस्सारण ( ड्रेनेज) विभाग, पर्यावरण विभाग आणि संबंधित क्षेत्रीय अधिकारी हे विभाग जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात नमूद केले आहे.
तक्रारदारांनी Environment (Protection) Act, 1986, Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974 तसेच IPC मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करणे, तलावात येणारे सांडपाणी त्वरित थांबवणे, पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी ठोस उपाययोजना करणे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जबाबदारी निश्चित करणेमुख्य या मागण्या करण्यात आल्या आहेत.
आयुक्तांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही न केल्यास न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा इशारा देण्यात आला असून, येत्या काळात हे प्रकरण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























