संतप्त ग्रामस्थांचा जालना SP कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा; जाफ्राबाद तालुक्यात खळबळ
जाफ्राबाद (प्रतिनिधी) :
जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण गावात बेकायदेशीर देशी-विदेशी दारू, गांजा व इतर अंमली पदार्थांच्या खुलेआम विक्रीमुळे गावातील सामाजिक व कौटुंबिक वातावरण पूर्णपणे बिघडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावात सर्रास सुरू
असलेल्या या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत चालली असून, गावात दहशत, गुंडगिरी आणि जातीय तेढ निर्माण होत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर थेट पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात गाडेगव्हाण येथील सकल ग्रामस्थांच्या वतीने जालना येथील पोलीस अधीक्षक यांना एक धडक तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. या निवेदनात गावातील अवैध धंदे चालवणाऱ्या संशयितांची नावे जाहीर करण्यात आली असून, प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
किराणा दुकानाच्या आडून नशेचा व्यापार
ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रार अर्जात गावातील संजय आसाराम सावंत, विजय आसाराम सावंत, विष्णू दगडू सावंत, अनिल कडुबा हिवाळे, अरुण नानाभाऊ सावंत, बबन कडुबा सावंत, विलास नानाभाऊ सावंत व कडुबा नाथा हिवाळे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपी हे आपल्या राहत्या घरातून तसेच गावातील किराणा दुकानांच्या आडून खुलेआम दारू व गांजाची विक्री करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
“गावात दिवसाढवळ्या नशेचा व्यापार सुरू आहे, तरुण मुले बरबाद होत आहेत, पण पोलिसांचे डोळे मात्र बंद आहेत,” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
कुटुंबे उद्ध्वस्त; महिलांमध्ये भीतीचे वातावरण
या अवैध धंद्यांमुळे गाडेगव्हाण गावातील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले असून, अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. गावात मद्यपी आणि नशेखोरांचा सुळसुळाट वाढल्याने महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी गावात दहशतीचे साम्राज्य असते, अशी आपबिती ग्रामस्थांनी मांडली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचे वाढले मनोबल
तक्रार अर्जात पुढे नमूद करण्यात आले आहे की, संशयित आरोपींपैकी काही जणांवर यापूर्वीच गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संजय आसाराम सावंत याच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आधीच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख निवेदनात आहे.
विष्णू दगडू सावंत व त्याच्या पत्नीवर वरुड येथील दंगल प्रकरणात सध्या न्यायालयीन खटला सुरू असल्याचेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.
अनिल कडुबा हिवाळे व अरुण नानाभाऊ सावंत हे दोघे गावात दारू व गांजा पुरवठ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा थेट आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, या सर्व गंभीर प्रकाराबाबत स्थानिक टेंभुर्णी पोलीस ठाणे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांच्या या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळेच आरोपींचे मनोबल वाढले असून, ते गावात उघडपणे दहशत माजवत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; अनर्थ घडण्याची भीती
“गावात नशेच्या बाजारासोबतच जातीय तेढ निर्माण करून वातावरण पेटवण्याचा पद्धतशीर प्रयत्न काही घटकांकडून सुरू आहे. जर वेळेत यावर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर गावात कोणताही मोठा अनर्थ घडू शकतो,” अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
…तर पोलीस प्रशासन जबाबदार राहील!
गाडेगव्हाण येथील सकल ग्रामस्थांनी आता आरपारची लढाई लढण्याचा पवित्रा घेतला आहे. जर या अवैध दारू-गांजाच्या विक्रीवर आणि संबंधित आरोपींवर तात्काळ कडक कारवाई झाली नाही, तर संतप्त ग्रामस्थ जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करून तीव्र आंदोलन छेडतील, असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच या दरम्यान जर काही जीवितहानी किंवा अनपेक्षित घटना घडली, तर त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासनच जबाबदार राहील, असेही ग्रामस्थांनी शेवटी म्हटले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















