खराडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण प्रकरणातील ५ आरोपींना अटक, ठेकेदाराची सुखरूप सुटका
पुणे : खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून अपहरण झालेल्या व्यावसायिकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
दि. १४ एप्रिल २०२६ रोजी इराणी कॅफे हॉटेलसमोर, खराडी येथे खडी क्रशर प्लांटसाठी जागा दाखविण्याच्या बहाण्याने एका रेल्वे मेट्रो ठेकेदाराचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. याप्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून खराडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्र. १२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०४(२), ३४२, ३०८(२), ३०८(३), ३०८(४), ३८९(२), ३९०, ३९९(२), ३९५(२), ३५९(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-४) श्री. सोमय मुंडे, तसेच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस ठाणे श्री. संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले.
तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे व पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल कोळपे तसेच इतर पोलीस अंमलदारांचा समावेश होता. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.
तपासात मुख्य आरोपी सागर दत्तात्रय झुंजरे (रा. लोणीकंद) याने तक्रारदाराला पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर वाहनात जबरदस्तीने बसवून अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर इतर साथीदारांसह तक्रारदाराला लोणीकंद, शिक्रापूर, सणसवाडी, रांजणगाव परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पेरणे फाटा परिसरात नाकाबंदी करून सापळा रचला आणि ५ आरोपींना ताब्यात घेत तक्रारदाराची सुटका केली.
अटक आरोपी :
१) सागर दत्तात्रय झुंजरे (वय ३९, रा. लोणीकंद)
२) विजय सुरेश वाळंज (वय ३८, रा. लोणीकंद)
३) राजू विजयकुमार सहाणे (वय ३२, रा. लोणीकंद)
४) रूपेश शिवाजी गावडे (वय ३८, रा. लोणीकंद)
५) प्रकाश बाळासाहेब उर्फ बाळू राऊत (वय ३४, रा. तुळापूर)
आरोपींकडून २ फॉर्च्युनर, १ स्कॉर्पिओ व १ मोबाईल असा एकूण सुमारे ४९.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे करीत आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोजकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-४) श्री. सोमय मुंडे, तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल कोळपे, तसेच पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, मनोज खरपडे, साहेबराव गंडाळे, सरज जाधव, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, विलास केदारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या धडाकेबाज कारवाईमुळे खराडी परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























