पुणे :
पुणे शहरातील शिक्षण मंडळ कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून तीन अपत्ये असतानाही नोकरी सुरू ठेवली असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने गेले दीड वर्ष सातत्याने पाठपुरावा करत सर्व वैध पुरावे, कागदपत्रे, जन्मनोंदी व लेखी तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केल्या आहेत. मात्र, तरीही आजतागायत कोणतीही ठोस किंवा कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक निर्णय टाळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. फाईल कधी एका टेबलावर, तर कधी दुसऱ्या टेबलावर पाठवून “चौकशी सुरू आहे”, “वरच्या कार्यालयाकडे प्रस्ताव आहे” अशी ठरावीक उत्तरे देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब केवळ निष्काळजीपणाची नसून प्रशासनातील टाळाटाळ व संभाव्य संगनमताकडे निर्देश करणारी आहे.
राज्य शासनाच्या सेवाशर्ती व नियमांनुसार दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणे बंधनकारक असताना, शिक्षण मंडळातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात आहे. सामान्य कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करणारे हेच प्रशासन, या प्रकरणात मात्र मौन का बाळगत आहे? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकारामुळे नियम पाळणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, “नियम सर्वांसाठी समान नाहीत का?” असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जर या प्रकरणात तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांसह कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नाही, तर हे प्रकरण राज्य शासन, संबंधित आयुक्त कार्यालय, तसेच न्यायालयीन स्तरावर नेले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात येत आहे.
प्रशासनाने वेळकाढूपणा थांबवून तात्काळ निर्णय घ्यावा व जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी, अन्यथा हा अन्याय उघडपणे रस्त्यावर आणला जाईल.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























