पुणे, विश्रांतवाडी (प्रतिनिधी): जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी मुकुंदराव आंबेडकर चौक, विश्रांतवाडी येथे पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने “झाडे लावा, झाडे जगवा” जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी नागरिकांना मोफत वृक्षांचे वाटप करण्यात आले. तसेच दिलेल्या वृक्षाचे एक वर्ष संगोपन करणाऱ्या नागरिकांना बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे संस्थापक राहुल बनसोडे यांनी केली.
कार्यक्रमाला पॅंथर सेनेचे सामाजिक कार्यकर्ते व संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या विषयावर तीव्र चिंता व्यक्त केली.
सचिन भोसले म्हणाले की, “झाडे लावा, झाडे जगवा” अशा घोषणा ट्रक, बस तसेच विविध शासकीय मोहिमांमध्ये दिसतात. पुणे महानगरपालिका देखील अशा घोषणा करते, मात्र झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी पुण्याचे हवामान आल्हाददायक व संतुलित होते. मात्र वाढते शहरीकरण आणि मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे शहराचे तापमान वाढत आहे.
त्यांनी आरोप केला की, नदी सुधार प्रकल्प (RFD) तसेच इतर विकासकामांमुळे हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मागील चार ते पाच वर्षांत पुणे शहरात सुमारे दहा हजार झाडे तोडण्यात आल्याने प्रदूषण वाढले असून हवामान बदलाचे गंभीर परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका लहान मुलांच्या भविष्यास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्लास्टिक प्रदूषणावर भाष्य करताना त्यांनी प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. कोविड-१९ काळात नागरिकांना ऑक्सिजनसाठी मोठी किंमत मोजावी लागली होती. त्यावेळी झाडांचे महत्त्व सर्वांना समजले. झाडे नागरिकांना मोफत ऑक्सिजन देतात, मात्र त्यांचे संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे आणि संस्थेच्या वृक्षसंवर्धन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.























