पुणे पोलिसांचा राजकीय पक्षांना दणका, पोलीस आयुक्तांचं कडक फर्मान
पुणे; दि.१७ (शशिकांत पाटोळे) : शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू नये, तसेच राजकीय संघर्षातून उद्भवणारे तणाव आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांनी सर्व राजकीय पक्षांना कडक इशारा दिला आहे.
यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाला दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यास किंवा आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट निर्णय पुणे पोलिस प्रशासनाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल घडलेल्या वादग्रस्त घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे कोणत्याही पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयासमोर मोर्चा, घोषणाबाजी किंवा आंदोलन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
*आंदोलनासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक*
लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार सर्वांनाच आहे, मात्र तो शांततामय, कायद्याच्या चौकटीत आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा न आणणाऱ्या पद्धतीने केला गेला पाहिजे. शहरातील वाहतूक व्यवस्था, नागरिकांचे दैनंदिन जीवन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे यापुढे आंदोलनासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील, तसेच ठरावीक ठिकाणीच आंदोलन करण्यास अनुमती दिली जाईल.
*कोणत्याही पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यास मनाई*
या निर्णयानुसार, राजकीय पक्षांनी आपले आंदोलन, निदर्शने किंवा मोर्चे प्रशासनाने निश्चित केलेल्या जागांवरच करावेत. कोणत्याही पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आले आहे.
*कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय*
दरम्यान, या निर्णयावर विविध राजकीय पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत करताना, सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तो आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काही पक्षांनी यावर नाराजी दर्शवत, लोकशाही अधिकारांवर बंधने येत असल्याची भूमिका मांडली आहे. मात्र, सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























