उमेदवार यादीत अचानक बदल; प्रभाग २७ नवी पेठ–पर्वतीतील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) उमेदवार क्षीरसागर अनिकेत वामन यांचा गंभीर आरोप
पुणे | प्रतिनिधी
कसबा विश्राम क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २७ (नवी पेठ – पर्वती) येथे सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत गंभीर स्वरूपाचा अन्याय व अपारदर्शकता झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे उमेदवार क्षीरसागर अनिकेत वामन यांनी केला आहे. अधिकृत उमेदवार यादीत कोणताही खुलासा न देता अचानक बदल करण्यात आल्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निवडणूक प्रशासनामार्फत दि. ३ जानेवारी रोजी पहिली अधिकृत उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत नियमांनुसार पात्र उमेदवारांचा अनुक्रम निश्चित करण्यात आला होता. या यादीच्या आधारे उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्याच दिवशी दुसरी यादी तयार करण्यात आली असून, ही बदललेली यादी दि. ७ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. विशेष म्हणजे या दुसऱ्या यादीवर देखील दि. ३ जानेवारी हीच तारीख नमूद आहे.
कोणताही लेखी खुलासा, कारण किंवा नियमांचा आधार न देता पहिल्या अधिकृत यादीत बदल करण्यात आल्याने उमेदवारांमध्ये तसेच मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकदा अधिकृतरीत्या उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर अशा प्रकारे बदल करणे हे लोकशाही मूल्यांना धरून नसून, यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, पहिल्या यादीत क्षीरसागर अनिकेत वामन यांचा अनुक्रमांक दुसरा असताना, नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत त्यांचा क्रमांक थेट सहाव्या स्थानावर नेण्यात आला आहे. या बदलामुळे उमेदवारांचे नियोजन, प्रचार आणि मतदारांमध्ये पोहोचण्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
दरम्यान, हा बदल सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांच्या दबावामुळे करण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत क्षीरसागर अनिकेत वामन यांनी निवडणूक प्रशासनाकडे लेखी खुलासा व चौकशीची मागणी केली आहे.
यासंदर्भात क्षीरसागर अनिकेत वामन म्हणाले,
“निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रथम प्रसिद्ध केलेल्या यादीतील अनुक्रमांकानुसार आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र काही दिवसांनी अचानक दुसरी यादी प्रसिद्ध झाल्यामुळे उमेदवारांमध्ये तसेच मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर गंभीर परिणाम होत आहेत.”
अशा महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाकडून झालेल्या या प्रकारच्या निर्णयांमुळे उमेदवारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























